Showing posts with label योग. Show all posts
Showing posts with label योग. Show all posts

Thursday, February 12, 2009

मुस्लमान योगकडे




मुसलमान योगाला जवळ करीत आहे

इंडोनेशिया, मलेशिया आणि पाकिस्तानात योगावर बंदी

फतव्यांच्या दलालांचा आणखी एक फतवा

मुसलमानदेखील रोगापासून मुक्ती मिळविण्यासाठी योगाला जवळ करीत आहे। कोणत्याही योग शिबिरात जाऊन पाहा- मुस्लिम महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. सकारात्मक मनोगत व्यक्त करायलाही ते कचरत नाहीत.

हिंदीतील प्रसिद्ध कवी स्व। हरिवंशराय बच्चन यांनी 74 वर्षांपूर्वी एक पुस्तक लिहिले होते - मधुशाला. या पुस्तकाने खळबळ माजवून दिली होती. घराघरात या पुस्तकाची चर्चा होती, परंतु काही दिवसांपूर्वी हे पुस्तक पुन्हा एकदा चर्चेत आले. या पुस्तकाविरोधात फतवा जारी करण्यात आला हे यामागील कारण होते.


या पुस्तकात दारूविषयी (मद्य) लिहिले आहे, त्यामुळे हे पुस्तक वाचणे योग्य नाही, असे म्हणत फतव्यांच्या दलालांनी फतवा जारी केला। फतव्याची मागणी करणारे आणि फतवा जारी करणारे, दोघांच्याही बुद्धीची कीव करावी वाटते. मधुशाला या पुस्तकात दारूची चर्चा आहे म्हणून त्यावर बंदी घालायची तर अपवादानेच एखादा उर्दू कवी शिल्लक राहील की, ज्याने दारू आणि दारूसंबंधी लिहिले नाही. उमर खय्याम यांच्यापासून गालिबपर्यंत सगळ्याच उर्दू कवींवर बंदी घालावी लागेल.


सामान्य मुसलमानाला हदीस आणि कुराणातील बारकावे माहीत नसतात। विद्‌वान मंडळी या ग्रंथांचा अभ्यास करून मार्गदर्शन करतात। योग्य मार्गदर्शन प्राप्त व्हावे या उद्देशाने फतवा काढण्याची प्रथा सुरू झाली, परंतु झाले भलतेच. सामान्य मनुष्य आपल्या बुद्धीने सहज समजून घेऊन चांगले काय-वाईट काय ठरवू शकेल, असे अनेक विषय असतात. अशा विषयांवरही आता फतवे निघत आहेत.


फतवा काढणारे पैसे घेऊन फतवा काढल्याची उदाहरणे आहेत. स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून फतवे काढणाऱ्या दलालांना साऱ्या जगाने पाहिले आहे. मुस्लिम उलेमांनी फतव्यांचा बाजार मांडलेल्या दलालांविरोधात एखादा प्रभावी फतवा काढला पाहिजे. यामुळे फतवा काढणाऱ्या दलालांना आवरता येईल.
काही फतवे राज्यघटना आणि प्रचलित कायद्यांच्या माध्यमातून येतात. यावर न्यायव्यवस्था काय पाऊल उचलू शकते, यावर विचार झाला पाहिजे. काही प्रकरणे तर न्यायालयाची अवमानना करणारे असतात.
आपल्या अनुयायांना आयु-आरोग्य लाभावे, अशी कामना कोणात्याही धर्माची असते। त्याचे शरीर तंदुरुस्त राहिले तरच तो ईश्वराची उपासना करू शकेल आणि समाजासाठी काही चांगल्या गोष्टी करू शकेल. त्यामुळे युनानमध्ये हाईजिया नामक देवीची पूजा करण्यात येऊ लागली. यामुळेच हाईजिनसारखा लाभदायी विषय जगासमोर आला. मुसलमान समाजात ]िह़फ़्ज़ाने सेहत'ची चर्चा होऊ लागली. निसर्गाने (कुदरत) निर्माण केलेल्या मनुष्याचे शरीर आरोग्यदायी आणि आकर्षक बनावे यासाठीचे मार्गदर्शन करण्यात आले. व्यायाम आणि परिश्रमाचे विविध प्रकार समाजात मूळ धरू लागले.


आयुर्वेद विज्ञानाची सुरुवात झाली तेव्हा मानवी जीवनात सदृढ आणि आरोग्यदायी शरीराचे चिंतन होत असणार। पतंजलींसारख्या महाऋषींनी यावर संशोधन करून या विषयाला विज्ञानाचे रूप दिले. सर्वसामान्य भाषेत याला "योग' अशी संज्ञा देण्यात आली.


पाश्चिमात्य देशांमध्ये सर्जरीच्या प्रांतात क्रांती झाली। पूर्व असो वा पश्चिम- सगळीकडे एकच उद्देश राहिला की, मानवी शरीर रोगमुक्त राहावे, परंतु पाश्चिमात्य राष्ट्रांनी रोगमुक्तीलादेखील व्यावसायाचे रूप दिले। आज उपचार इतके महागडे झाले आहे की, ओबामासारख्या व्यक्तीला राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या वेळी अमेरिकी जनतेला आश्वासन द्यावे लागले की, जर ते निवडून आले तर अमेरिकेत उपचार स्वस्तात होतील आणि प्रत्येक अमेरिकन मनुष्य रोगमुक्त असेल.


पश्चिमेच्या प्रभावामुळे भारतातही रोगनिदान महागडे बनले। कृत्रिम वातावरणामुळे एक तर नवनवीन आजार फैलावू लागले आणि त्यावरील उपचारही महागडे होऊ लागले। पाश्चिमी प्रभाव असूनही भारतातील एक वर्ग आपला प्राचीन वारसा जपून ठेवला. भारतीय शास्त्रात सांगितल्यानुसार आचरण चालू ठेवण्याचे महान कार्य या वर्गाने केले.


जेव्हा रोग वाढू लागले आणि त्याबरोबर रोगांवरील इलाज महाग होत चालला तेव्हा लोक थकून भागून योगासनांकडे वळू लागले। याचा मोठा परिणाम झाला। प्रात:काळी आपल्या घरात योगाचा लाभ घेत नाही अशी घरं भारतात अपवादानेच सापडण्याजोगी स्थिती निर्माण झाली. युरोप आणि अमेरिकेत पोचून भारतीय योग शिक्षक लाखो डॉलर कमवू लागले.


प्रत्येक भारतीय योगाकडे आकर्षित होताना आपण आज पाहतो आहे। सहजपणे योग शिकविण्याची आणि लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची आवश्यकता होती। वर्तमान काळामध्ये योग घराघरात पोचविण्याचे मोलाचे काम कोणी केले? असा प्रश्न कोणापुढेही केला तर स्वाभाविक उत्तर येईल-स्वामी रामदेव. भारतातील ऋषी मुनी जे काम युगानुयुगे करीत राहिले, त्याला सार्वजनिक रूप देण्याचे काम या महापुरुषाने केले. त्यामुळेच प्रत्येक शहरात त्यांची शिबिरे भरतात आणि त्यात शेकडो लोक सहभागी होतात.


योगपद्धती अत्यंत प्राचीन आहे। त्यामुळे संस्कृत शब्दांची रेलचेल त्यात असणे स्वाभाविकच आहे। तसेच योग करणाऱ्यांमध्ये साधू प्रवृत्ती निर्माण होणे हीदेखील काही नवी गोष्ट नाही. त्यामुळे त्या व्यक्तीने भगवे वस्त्र धारण केले तर त्यात आश्चर्य करण्यासारखे काहीही नाही. आजारी मनुष्याला तर रोगमुक्ती पाहिजे आणि त्यासाठी कमीत कमी खर्च झाला पाहिजे. त्यामुळे ते रामदेव बाबा यांच्यासारख्या साधूंनी सुरू केलेल्या योग शिबिरात सहभागी होतात. आज तर योग आणि रामदेव बाबा हे समानार्थी शब्द झाले आहेत. ही लोकप्रियता अनेक लोकांच्या मनात असूया निर्माण करू शकते. वृंदा कारतदेखील स्वत:ला यापासून दूर ठेवू शकल्या नाहीत. त्यांनी योगाला राजकारणात ओढून या भारतीय जीवनपद्धतीला आरोपीच्या पिंजऱ्यात ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यात कारत बाईंना काही यश आले नाही.


जगातील कोणताही रोग एखाद्या विशिष्ट जाती किंवा धर्मासाठी मर्यादित नसतो। जेथे गरिबी आणि दारिद्र्य आहे तेथे तर रोग अत्यंत वेगाने पसरतात. रोग शरीरात ठाण मांडतात. भारतातील मुसलमान समाजात गरिबी आणि लाचारी भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे मुसलमान समाजदेखील रोगापासून मुक्ती मिळविण्यासाठी योगाला जवळ करीत आहे. कोणत्याही योग शिबिरात जाऊन पाहा- मुस्लिम महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. ते जेव्हा रोगमुक्त होतात, तेव्हा आपले सकारात्मक मनोगत व्यक्त करायलाही ते कचरत नाहीत.


टीव्हीवरील अनेक वाहिन्यांवर होणाऱ्या प्रश्नोत्तरांतून हे सत्य आपण पाहू शकतो, परंतु मुस्लिम बांधवांचे रोगमुक्त होणे मुल्ला-मौलवींना आवडले नाही। मुसलमान महिला आणि पुरुष आपल्या रोगमुक्तीसाठी योग शिबिरात जाऊ लागले तर ते अन्य समाजातील लोकांच्या संपर्कात येतील आणि त्यामुळे आपला प्रभाव क्षीण होऊ लागेल, अशी भीती त्यांना वाटू लागली आहे। धर्मभीरू मुसलमानांना धर्माची भीती घालूनच योगाकडे जाण्यापासून थांबविता येऊ शकते. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी आपले जुने शस्त्र बाहेर काढले आणि योगाला इस्लामविरोधी घोषित करून टाकले.


असे असले तरी मौलानांमध्ये असाही एक वर्ग आहे की, जो फतवा काढणाऱ्या मौलानांच्या विरोधी विचारांचा आहे। या मौलानांचे म्हणणे आहे की, योगात इस्लामविरोधी असे काहीही नाही. फतवा देणाऱ्या मुसलमानांचे म्हणणे आहे की, योग शिबिरात मुस्लिम महिलेला गैरपुरुषांमध्ये जावे लागते. दुसरी गोष्ट म्हणजे ती त्या शब्दांचे उच्चारण करते की, ज्या शब्दांचे उच्चारण करणे इस्लामला मान्य नाही.


विशेषत: ॐ शब्दाला त्यांचा आक्षेप आहे। हिंदू धर्म हा विशालहृदयी धर्म आहे। कोणत्याही ईश्वराची उपासना केली तरी ती शेवटी एकाच ईश्वराला मिळते, अशी धारणा हिंदू धर्माची आहे. त्यामुळे अनेक योगींनी ॐ च्या स्थानी अन्य समकक्ष शब्दाचा वापर करण्याची मुभा दिली आहे. तुम्हाला वाटले तर ॐ च्या ठिकाणी तुम्ही आमीन या शब्दाचाही उपयोग करू शकता. येथे कशाचे उच्चारण करता याला फारसे महत्त्व नाही; श्वास घेताना आणि सोडताना ॐ च्या समकक्ष भार असणाऱ्या शब्दाचा उपयोग करता येणे शक्य आहे. त्यामुळे फतवा काढणाऱ्यांच्या आक्षेपात काहीच दम राहत नाही.


राहता राहिला प्रश्न मुस्लिम महिलांच्या जाण्या-येण्याचा। रुग्णालयांमध्ये अन्य डॉक्टर्स आणि अन्य रूग्ण नसतात काय? फतवा देणाऱ्यांचा मुसलमान महिलांच्यावर इतकाही विश्वास नाही? अशा मानसिकतेमुळे तर ते आपल्या समाजातील अर्ध्या लोकसंख्येचा अपमान करतात आणि त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात ढकलतात।


मुसलमानांनी योग केले पाहिजे अथवा नाही, यावर "आज तक' या वृत्त वाहिनीने चर्चा सुरू केली आहे। इंडोनेशिया, मेलेशिया आणि पाकिस्तानने योगाला गैर इस्लामी ठरवून त्यावर बंदी आणली आहे, या निमित्ताने "आज तक'ने ही चर्चा सुरू केली आहे. इंडोनेशिया येथील उलेमा कौन्सिलचे म्हणणे आहे की, योग करताना हिंदू मंत्रांचा जप करण्यात येतो. देवबंद मदरशाने यावर फतवा जारी केलेला नाही. योग करणे योग्य असल्याचे देवबंदने म्हटले आहे. याआधीच योगाला इस्लामविरोधी ठरवलेल्या मौलानांची संख्या काही कमी नाही.


योगाशी नमाजला जोडणे योग्य नाही। कारण दोन्हींचे उद्देश वेगळे-वेगळे आहेत। नमाज व्यायामासाठी नाही; ईश्वरासमोर शरणागती पत्करण्यासाठी आहे. नमाजातील काही गोष्टी योगातील मुद्रांशी मिळतीजुळती आहेत, याचा अर्थ असा नाही की, नमाज अदा करणे म्हणजे योग करणे. योगासन म्हणजे नमाजाचे रूप नाही. योग आणि नमाज दोन्ही गोष्टीला एकमेकांशी जोडणे तर्कसंगत नाही, परंतु रामदेव बाबा यांनी योगाला आजच्या काळात लोकप्रिय बनविले हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. योगासन करण्यासाठी कोणत्याही प्रतिष्ठान, संस्था यांच्या परवानगीची आवश्यकता नाही अथवा कोणत्या धर्मगुरूच्या परवानगीचीही आवश्यकता नाही. योग हे तर सर्वांसाठी खुले रुग्णालय आहे. या रुग्णालयाचे स्वागत साऱ्या मानव जातीने केले पाहिजे.


टीप : इस्लामचा उदय होण्यापूर्वी 5 हजार वर्षे योगावरील ग्रंथाची निर्मिती ऋषी पतंजली यांनी केली.