Tuesday, May 11, 2010

प्रेमिकांच्या छळवणूक कथा

शोएब मलिक हा एक लबाड प्रेमीआहे. इतकेच नव्हे तर त्याच्या मनात भारताप्रती प्रचंड घृणा आणि द्वेषभावना आहे. तो आपल्या खेळाप्रतिदेखील प्रामाणिक नाही. जो आपल्या देशाशी प्रामाणिक नसेल, तो आपल्या भावी पत्नीप्रति किती प्रामाणिक राहणार? याचे उत्तर मिळण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
टेनिस जगतात भारताचे नाव पुढे आणणारी सानिया मिर्झा लवकरच पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याच्याशी विवाहबद्ध होणार आहे. या भावी जोडीला आमच्या अनेक बधाईयॉं. वधुवर बनून बोहल्यावर चढण्यापूर्वीच दोघांचा भूतकाळ हात धुवून मागे लागल्याचे दिसत आहे. दोघांनीही आपापल्या क्षेत्रात कीर्ती मिळवली आहे, परंतु हे दोघे अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही अडकले आहेत. सानिया जेव्हा टेनिसच्या मैदानात आली तेव्हा मुल्ला-मौलवींनी तिच्याबद्दल कडक नाराजी व्यक्त केली होती. सानियाच्या कपड्यांवरून चर्चा रंगली होती. दुसरा कोणता इस्लामी देश असता तर तिला गुडघे टेकावे लागले असते, परंतु भारतात कठमुल्लांची डाळ शिजली नाही.
सानिया मैदानात टिकून राहिली आणि शेवटी तिनेे स्वत:ला समर्पित खेळाडू म्हणून प्रस्थापित केले. अधूनमधून तिच्या विवाहविषयक बातम्याही वाचायला मिळायच्या. हैदराबादच्या एका मोठ्या बेकरी मालकाच्या मुलाशी विवाह ठरल्याच्या बातम्याही वाचायला मिळाल्या. बेकरी मालकाचा मुलगा सोहराब हा सानियाचा बालमित्र. बेकरी मालकाच्या परिवाराशी सानिया मिर्झा यांच्या कुटुंबीयांचे घनिष्ठ नाते असल्यामुळेच हा विवाह ठरला होता. ही वार्ता लोकांपर्यंत पोहोचते न पोहोचते तोच ठरलेला विवाह तुटल्याच्या बातम्याही येऊन थडकल्या.
सानियाच्या खेळाविषयी झाल्या नाहीत तेवढ्या चर्चा तिच्या वेगवेगळ्या प्रकरणांवरून झाल्या. विवाहपूर्व शारीरिक संबंधांचे सानियाने जाहीर समर्थन केले. हे तिचे वैयक्तिक मत असू शकते, परंतु तिरंग्याविषयी तिने व्यक्त केलेल्या मताने मात्र कोट्यवधी भारतीयांच्या भावना पायदळी तुडविल्या गेल्या. तरीही मोठ्या मनाने भारतीयांनी हैदराबादच्या या मुलीला सन्मान दिला. टेनिसच्या मैदानात सानिया भारताचा झेंडा सदैव फडकवीत ठेवेल, याविषयी दृढ विश्वास व्यक्त केला.
काही दिवसांपूर्वी आलेल्या सानियाच्या बातम्यांमुळे खळबळ माजली. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्याशी सानिया विवाह करणार असल्याची बातमी तशी खळबळजनकच होती. सानियाच्या घरच्या मंडळींकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा विवाह 15 एप्रिलपर्यंत संपन्न होऊन जाईल. गेल्या आठवड्यातच त्या दोघांनी गुपचूप विवाह केल्याचीही चर्चा आहे.
तसे पाहिले तर वयात आलेल्या मुला-मुलींना आपला साथीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु पती-पत्नी बनल्यानंतर दोघांचे ग्रहस्थी जीवन सुखाचे होईल, याची काळजीही भारतीय संस्कृती करते. भविष्य कोण जाणलंय? परंतु वातावरणाचा कानोसा घेतला तर सानियासाठी भावी गृहस्थी जीवन खूपच कठीण दिसते.
शोएब मलिक हा सडकछाप प्रेमी आहे. त्याच्या स्वभावावरून वाटते की, पाकिस्तानात पुन्हा एकदा रीना रॉय हिच्या प्रकरणाची पुनरावृत्ती होईल. मोहसीन खान हा पूर्वीच्या काळचा नावाजलेला क्रिकेट खेळाडू. त्या काळातील प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री रीना रॉय त्याच्या प्रेमात फसली. रीना रॉय हिच्यावर काय गुदरलं माहिती आहे? रीना रॉय हिचे सारे उपकार मोहसीन खान विसरून गेला. सानियाच्या विवाहप्रसंगी रीना रॉय इतकेच म्हणेल की, सानियाला शुभेच्छा देणे ही तर आपली संस्कृती आहे, परंतु शुभेच्छांसोबत माझी कला आणि करियरचा सत्यानाश करणाऱ्या पाकिस्तानला दु:खाचे सुस्कारे आणि वेदनेचे हुंदकेही घेऊन जा!
क्रिकेटच्या मैदानावरील खेळ पाहून आपल्या प्रेमात पडलेल्या प्रेमिकांना पत्नी बनवल्यानंतर तिचे सौंदर्य, बोैद्धिक कुशलता, चंचलता, चपळता आणि समर्पण या साऱ्यांचा निर्घृण खून कसा पाडला जातो, तिची संपत्ती हडप करून तिच्या यौवनावर कसा घाला घातला जातो, याविषयी काही जाणून घ्यायचे असेल तर जमाइमा हिला अवश्य विचारा. ती इम्रान खान याच्या प्रेमात पडून त्याची पत्नी बनली होती. ती त्याच्या दोन मुलांची आई बनली होती, परंतु त्यानंतर एक दिवस या विदेशी महिलेला आपल्या लंडन येथील माहेरी परतावे लागले.
जमाइमा हिने इम्रान याच्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला, परंतु या मदांध आणि विक्षिप्त क्रिकेटपटूने जमाइमा हिला भिकेला लावले. त्याने आरोप केला की, तुझ्यामुळे मी निवडणूक जिंकू शकत नाही. पाकिस्तानचा पंतप्रधान बनणे हे माझे स्वप्न आहे, परंतु तू एका यहुद्याची मुलगी आहेस. माझा देश पाकिस्तान तुझा स्वीकार कसा करेल?
जमाइमा हिच्या वडिलांना केवळ दोन मुलीच होत्या. तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि इम्रान याला प्रचंड संपत्ती मिळाली. यानंतर इम्रान याने बिचारी जमाइमा हिला केवळ पाकिस्तानातूनच नव्हे तर आपल्या मनातूनही हाकलले. इम्रान खान हा पाकिस्तानचा पंतप्रधान बनू शकला नाही. तो कसाबसा संसदेपर्यंत पोहोचू शकला. आता तो राजकारणाच्या दलदलीत फसल्याचे दिसत आहे. त्याची दोन्ही मुले आईजवळ लंडनमध्ये वाढत आहेत. असे आहे पाकिस्तानातील क्रिकेटपटूंचे चरित्र, चारित्र्य आणि काळाकुट्ट इतिहास!
केवळ क्रिकेटपटूंच असे करतात असे नाही. पाकिस्तानातल्या कोणत्याही क्षेत्रावर दृष्टी टाका. अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतील. प्रसिद्ध गायिका नूरजहॉं ही मोठी स्वप्ने घेऊन पाकिस्तानात गेली होती. तिचा प्रिय पती शौकत नावाजलेला दिग्दर्शक होता. तिला काय माहीत की हा पती एक दिवस आपल्याला तलाक तलाक तलाक म्हणून घराबाहेर काढेल? नूरजहॉं हिला पाकिस्तानात गेल्याबद्दल खूप पश्चाताप करावा लागला. याबद्दल खूप लिहिले गेले आहे.
डायनाच्या घटस्फोटानंतर पाकिस्तानी डॉक्टर एहसान खान याच्याशी तिचे सूत जुळेल असे वाटत होते. त्यावेळी पाकिस्तानी मोठ्या अभिमानाने सांगायचे की, डायना एक दिवस पाकिस्तानची सून बनेल, परंतु तिच्या भाग्यात दुसरेच लिहिले होते. एहसान याच्या जाळ्यात अडकण्यापूर्वीच मृत्यूने तिची सुटका केली. पाकिस्तानात प्रेम तर करता येते, परंतु त्याला विवाह म्हणून कायदेशीर मान्यता मिळत नाही. इस्लाममध्ये आपल्या पद्धतीने निकाह करणे बंधनकारक असते. सर्वात आधी गैरमुस्लिमाला मुस्लिम बनावे लागते. त्यानंतरच ती एखाद्या मुसलमानाची पत्नी बनू शकते.
शरियतनुसार एका मुसलमानाला चार बायका करण्याची परवानगी आहे. प्रेमिकाच, पण जिने निकाह केला आहे, तिचा कोणता नंबर? हे तर तिच्या भाग्यावर अवलंबून असते. तिचा प्रेमी पती तिला किती दिवस आपल्या निकाहात ठेवेल आणि कधी तलाक देईल, याची भविष्यवाणी करणे अवघड असते. विवाहाचा विचार करता पती हा एकप्रकारे हुकूमशहाच असतो. इस्लामने तर पत्नीला खुला (स्त्रीकडून दिला जाणारा तलाक) चा अधिकार दिला आहे, परंतु बिचाऱ्या किती महिलांना खुला मिळतो! याची कुठेच गणती नाही. येथे केवळ आणि केवळ पुरुषांचाच अधिकार चालतो.
आजवर आलेल्या बातम्यांवरून आता सिद्ध झाले आहे की, शोएब मलिक हा आधीपासूनच विवाहित आहे. त्याचा आयेशा सिद्दिकी नामक तरुणीबरोबर निकाह झाला होता. त्याने आता तिला तलाक दिला आहे. आयेशाच्या वडिलांनी पोलीस ठाणे जवळ केल्यामुळे शोएब अडचणीत आला. पोलिसांनी त्याचे पारपत्र जप्त केले. अटकेची शक्यता होती. त्यामुळेच सुरुवातीला उर्मटपणा करणारा शोएब तलाक द्यायला तयार झाला.
शोएब याने मिस इंडिया सायली भगत हिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ती या लांडग्याच्या तावडीत फसली नाही. त्याची पाकिस्तान क्रिकेट संघातील सर्वात बदनाम कॅप्टन म्हणून ओळख आहे. मॅच फिक्सिंगपासून क्रिकेटसंबंधित सगळ्याच गुन्ह्यांमधे तो आकंठ बुडाला आहे. त्यामुळे क्रिकेटपटू म्हणून त्याचे भवितव्य काय असेल, हे सांगणे कठीण!
त्याने क्रिकेटच्या माध्यमातून भारताशी सदैव शत्रुत्व जपले आहे. गेल्यावेळी भारताकडून पाकिस्तानचा पराभव झाला होता, तेव्हा जगातील साऱ्या मुसलमानांची शोएब याने क्षमायाचना केली होती. क्रिकेटच्या मैदानात त्याची भूमिका सदैव धर्मांध मुसलमानाला शोभेल अशीच राहिली आहे. पाकिस्तानच्या या माजी कर्णधाराला ऑस्ट्रेलिया दौऱ्याप्रसंगी अनुशासनहीनतेसाठी एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती.
सानियाचेही टेनिसमधील आकर्षण आता कमी होताना दिसत आहे. विश्व टेनिस स्पर्धेत 2007 मध्ये तिचे स्थान 27 वे होते. 2008 मध्ये ती 92 व्या स्थानावर फेकली गेली. सानिया आणि शोएब या दोघांनी लग्नानंतर दुबईत राहणार असल्याचे म्हटले आहे. शोएब पाकिस्तानकडून आणि सानिया भारताकडून खेळतील असे त्यांचे म्हणणे आहे. आपल्या मनाला हे वक्तव्य चांगले वाटत असले तरी यात काही तथ्य नाही. सानियाला भारताकडून मन:पूर्वक शुभेच्छा आहेत, परंतु पाकिस्तान्यांच्या परंपरेनुसार सानियाची फरफट प्रेमिकेकडून छळवणूक कथेकडे झाली, तर ती एका चांगल्या खेळाडूच्या करियरची आत्महत्या ठरेल!
अनुवाद : सिद्धाराम भै. पाटील

No comments:

Post a Comment