Tuesday, May 11, 2010

अनुवांशिक आजारांचा धोका

लेखात म्हटले आहे की, भारतामध्ये असणारे रीतीरिवाज पाकिस्तानातही जवळपास तसेच आहेत. चुलत, मामे, मावस आणि आत्येभाऊ आणि बहिणी यांच्यामध्ये होणाऱ्या विवाहांवर दि न्यूज ने जोरदार टीका केली आहे. अशा विवाहांमुळे अनुवांशिक आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचा इशारा सदर वृत्तपत्राने पाकिस्तान सरकार आणि जनतेला दिला आहे.
या जगात जे जे जुने आहे ते ते सर्व टाकाऊ आहे असे नाही आणि जे जे नवे आहे ते ते सारे चांगलेच असते असेही नाही. वेळोवेळी होणारे प्रयोग आणि येणारे अनुभव यातून चांगले किंवा वाईट ठरत असते. एके काळी लग्नासाठी मुलगा आणि मुलगी आपल्याच समाजातील असावेत असा आग्रह असायचा.
काही समाजामध्ये तर आईकडून 16 गोत्र आणि वडिलांकडून 16 गोत्र सोडून वधू-वरांचे विवाह निश्चित केले जायचेे. रक्ताचे नाते जेवढे दूरचे असायचे तेवढेच त्यांचे संतान धष्टपुष्ट, निरोगी आणि बुद्धिमान जन्माला यायचे, परंतु स्त्री आणि पुरुष यांच्या जन्मांचे प्रमाण विस्कळीत झाले आणि त्यामुळे दूरचे वधू-वर शोधणे कठीण बनले. जन्मकुंडली हाच एकमेव आधार बनला.
भारतीय समाजामध्ये विवाह हा एक संस्कार आहे. संस्कार पूर्ण करण्याच्या भिन्न-भिन्न पद्धती आहेत. काळाच्या ओघात या पद्धतींमध्ये शिथिलता येत गेली. याचे दुष्परिणाम आता पाहायला मिळत आहेत.
पाकिस्तानची निर्मिती इस्लामच्या नावाने झालेली असली तरी प्राचीन काळापासून तिथे राहणारी जनता तर भारतीयच आहे. त्यामुळे त्यांची विचार करण्याची पद्धत आणि सामाजिक मनसुद्धा भारतीयच आहे. केवळ उपासनापद्धती बदलल्यामुळे (मुस्लिम झाल्यामुळे) त्यांचा पिंड थोडाच बदलणार आहे?
पाकिस्तानातही आता मुलांमध्ये अनुवांशिक समस्या पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानात ही समस्या मोठ्या प्रमाणात फैलावत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील इंग्रजी दैनिक दि न्यूजने यासंबंधात एक अत्यंत रोचक आणि चकीत करणारा लेख प्रकाशित केला. या लेखाचे शीर्षक आहे, "विवाह और बिमारीयॉं'.
नात्यात विवाह केल्यानंतर जन्मणाऱ्या मुलांची बौद्धिक क्षमता अतिशय क्षीण असते. त्यांच्या आयक्यू आणि ऍप्टीट्यूड चाचण्यांवरून दिसून येते की, त्यांची बुद्धी कुशाग्र नसते. ही बाब तर मुले जेव्हा वाचू-लिहू लागतात तेव्हा ध्यानात येते, परंतु यापूर्वीच ते भयंकर आजारांना बळी पडतात. याविषयांवरील चर्चेला अग्रक्रम दिला गेला पाहिजे, असे न्यूजने म्हटले आहे.
लेखात पुढे म्हटले आहे की, आम्हाला कसला पाकिस्तान तयार करायचा आहे, दृढ आरोग्य असणारी भावीपिढी की, येत्या काळातील रोगग्रस्त पाकिस्तान?
काही दिवसांपूर्वी बलुचिस्तानात 15 हून अधिक मुले एका दुर्मिळ आणि मृत्यूच्या जबड्यात नेणाऱ्या भयानक चर्मरोगाला बळी पडली आहेत. या आजाराचा सर्वात घातक पैलू म्हणजे सूर्याच्या अतिनील किरणांना झेलण्याची क्षमता समाप्त होऊन जाते. बलुचिस्तान तर सोडाच लाहोर आणि कराचीसारख्या शहरांमध्ये देखील यावर उपचार होणे अशक्य आहे. या आजारासंबंधी उपाययोजना करण्यात पाकिस्तान सरकार निष्क्रिय आहे. तेथील सामाजिक संस्थांनाही याचे काही देणे-घेणे नाही.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका एन.जी.ओ. ने या विषयावर एका परिसंवादाचे आयोजन केले होते. त्यामुळे या आजाराची भीषणता समाजासमोर आली. पाकिस्तानातील सुजाण नागरिकांनादेखील याविषयी खूपच कमी माहिती आहे.
याविषयावर विचार व्यक्त करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, या समस्यांचे विवाह हेच कारण आहे. अनेक पिढ्यांपासून निकटवर्ती नात्यात विवाह होत आहेत. त्यातूनच या घातक रोगांचा जन्म होतो. जवळच्या नात्यांमध्ये वधू-वर शोधणे सोपे आहे, परंतु यामुळे आगामी काळात जन्मणारी पिढी घातक आजारांना बळी पडणार आहे. अशा विवाहांमुळे कोणकोणत्या प्रकारचे रोग होऊ शकतात याचे वर्णन या छोट्याशा लेखात करता येणार नाही, परंतु रक्ताचा कॅन्सर आणि थॅलिसिमीया हे आजार सर्वांच्याच परिचयाचे आहेत.
बलुचिस्तान हा प्रदेश तसा मागास समजला जातो. प्रत्येक तिसऱ्या कबिल्यात असा एकतरी रोगी आढळतोच. महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर असणे तर तेथे सर्वसामान्य बाब आहे. सुरुवातीला डॉक्टरांना वाटायचे की, ज्या माता आपल्या मुलांना स्तन पाजत नाहीत त्या महिलांमध्ये हा रोग होतो, परंतु आता माहीत झाले आहे की, स्तनाचा कॅन्सर हा नात्यातल्या विवाहामुळे होतो. मामेभाऊ अथवा मामेबहीण यांच्याशी होणाऱ्या विवाहामुळे स्तनाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण अधिक आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या कोपेनहेगन संमेलनात एक तथ्य समोर आले की, अधिक गोंगाट हा कानासाठी सर्वाधिक हानिकारक आहे आणि मनुष्याला यामुळे बहिरेपण येते. अचानक कानावर येणाऱ्या मोठ्या आवाजामुळे हृदयावर मोठा घातक परिणाम होतो, हे सर्वांनाच माहीत आहे, परंतु गोंगाटामुळे बहिरेपण येते, ही माहिती नवी आहे.
कराचीमधल्या रेहडीगोठ या भागात बहिरी मुलं जन्माला येऊ लागली आहेत. एधी फाऊंडेशनने पाकिस्तान सरकारचे याकडे लक्ष वेधले आहे. बिलकीस एधी यांचे म्हणणे आहे की, मुलींमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. पाकिस्तान सरकारचे याकडे लक्ष वेधले तरी काही उपयोग झाला नाही.
वातावरणातील मोबाईल आणि विद्युत तरंग यांचा मातेच्या गर्भावर विपरित परिणाम होतो. आज अवकाशात जाण्याची स्पर्धा लागली आहे. त्यासाठी बनविले जाणारे यंत्र आणि संवादासाठीची साधने खूपच घातक सिद्ध झाली आहेत. नात्यातल्या विवाहामुळे जन्मजात बहिरेपणा नवजात शिशुमध्ये का येत असावा, यावर सध्या संशोधन सुरू आहे.
जन्मत:च आजार घेऊन येणाऱ्या बालकांवर उपचार करणे खूपच कठीण असते. जन्मानंतर येणाऱ्या बहिरेपणावर उपचार करणे सोपे असते, परंतु जन्मत:च बहिरे असणाऱ्या बालकांवर उपचार करणे अशक्य असते.
विवाहापूर्वी लोकांची जनुकीय चाचणी करण्याचा कायदा करण्याचा विषय काही दिवसांपूर्वी चर्चेत आल्याचे दि न्यूजनी म्हटले आहे, परंतु पाकिस्तानात हे सर्व घडून येणे कठीण वाटते. कारण हा समाज आजही रूढीवादी समजला जातो. आशियातील 2-3 देश सोडले तर असा कायदा कोठे आहे?
भारत हा तसा पुढारलेला देश आहे, परंतु आमची पारंपरिक विचार करण्याची पद्धत कसे बदलणार? जेथे विवाहापूर्वी वधू-वरांनी एकमेकांचे मुख पाहण्यातही अनेक अडचणी आहेत, तेथे या गोष्टी कशा शक्य होणार?
समाजाला या भयंकर अनुवांशिक आजारातून मुक्त करायचे असेल तर लोकांमध्ये जागरुकता निर्माण केली पाहिजे. लोकांना समजले पाहिजे की, पहिल्या चुलत नात्यांमध्ये विवाह म्हणजे अनेक रोगांना आमंत्रण. लोक अशा विवाहांचे समर्थन करतात, कारण असे विवाह ठरविणे मोठ्या लोकांना खूपच सोपे असते. यामुळे कबिल्याबाहेर विवाह करायचा नाही या गोष्टीलाही बळ मिळते.
दि न्यूजने म्हटले आहे की, बलुचिस्तानची कहाणी टी.व्ही. वर गाजती आहे, परंतु वृत्तपत्रांनी देखील अशा मुद्द्यांवर लोकांमध्ये जागृती घडवून आणली पाहिजे.
या समस्येचे सर्वात मोठे कारण आहे एखाद्या नव्या धर्माचा उदय आणि एखाद्या नव्या पंथ-संप्रदायाची सुरुवात. सुरुवातीला जमलेले मूठभर लोक अधिक करून आपापसात नाते जुळवतात. संख्या कमी असते तेव्हा लोक जवळच्या नात्यातच मुलं-मुली शोधतात. ही जवळीकताच अनुवांशिक आजारांचे कारण बनते.
फार पूर्वी दळणवळणाची साधने खूप कमी होती. त्या काळात जवळच्याच लोकांशी विवाह जुळवणे सोयीचे होते. आजही जे लोक विदेशात राहतात आणि आपल्याच धर्म किंवा जातीला प्राथमिकता देतात ते नकळतपणे या आजारांना आमंत्रण देतात. वधू-वर विषयक जाहिरातींमुळे खूप मोठा बदल झाला आहे, परंतु जेथे समाज अशिक्षित आहे आणि प्रसिद्धी माध्यमापासून दूर आहे, त्यांच्यासाठी आजही दूरचा विवाह अडचणीचा ठरतो. नात्यामध्ये विवाह जुळवण्यामागे घटस्फोटाची भीती हेही एक कारण आहे.
परिवार आणि कबिल्यातील ज्येष्ठ व्यक्ती विचार करतात की, कुळाचा दबाव आणि समाजाच्या भीतीमुळे वैवाहिक जीवन निभावून नेणे सहजशक्य बनते, परंतु प्रत्येक समाजात वाढत चाललेली घटस्फोटाची प्रकरणे पाहिली म्हणजे यात काही तथ्य नाही, हे दिसून येते.
समाजात जेव्हा मुलं किंवा मुलींचे प्रमाण कमी असते, तेव्हा साटे-लोटे प्रथा प्रबळ बनत जाते. एकाच्या बदल्यात दुसरे, याचा सरळ अर्थ आहे जाणीवपूर्वक नात्यातच विवाह ठरविले जात आहेत. नात्यातल्या विवाहांमागे कोणतीही कारणे असली तरी त्याचे दुष्परिणाम आपल्या समोर आहेत.
वैज्ञानिकदृष्ट्या संशोधन झाल्यानंतरही आपण जर मामे, चुलत, आत्ये आणि मावस भाऊ अथवा बहिणींशी विवाह करीत असू, तर याचा अर्थ असा आहे की, आपण स्वत:हूनच अनुवांशिक रोगांना आमंत्रित करीत आहोत. परिणामी तीन चार वर्षांच्या मुला-मुलींच्या डोळ्यांवर चष्मा येत असेल तर याला जबाबदार कोण?
अनुवाद : सिद्धाराम भै. पाटील

No comments:

Post a Comment